


बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय (दाते कॉलेज) च्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा दाते कॉलेज च्या प्रांगणात शनिवार, दि. २५/०१/२०२५ रोजी थाटात पार पडला. या मेळाव्यास १०६५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता झाले. त्यावेळी व्यासपीठावर विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, महाराष्ट्र राज्याचे मृदा व जालसंचारण मंत्री व दाते कॉलेजचे माजी विद्यार्थी ना. संजय राठोड, माजी मंत्री व माजी विद्यार्थी प्रा. वसंत पुरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, संस्थेचे संचालक श्री. मंगेश केळकर व विजय कासलीकर, संचालिका सुषमा दाते, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रानडे, मोहन देव, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला बाबाजींच्या प्रतिमेस पुष्पार्चनानंतर पसायदान ही महाविद्यालयीन प्रार्थना झाली. त्यानंतर संगीत विभागाच्या वतीने स्वागत गीत सादर करण्यात आले.
महाविद्यालयाचा काळ सर्वात सुंदर असतो. कधीही न परत येणारं तारुण्य इथे बहरत असतं. कट्ट्यावर गप्पा मारल्या जातात. आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे महाविद्यालय जीवन होय, असे प्रतिपादन विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते यांनी यावेळी केले. प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू यांनी ‘माजी विद्यार्थी मेळावा’ ही संकल्पनाच रोमांचित करणारी आहे. जुन्या मित्रांची भेट, अनुभवांचे शेअरिंग आणि आठवणींचे पुनरुज्जीवन हे तीन उद्देश यामागे आहेत. आज जे नवे शिक्षण धोरण सांगतं, ते बाबाजींनी या कॉलेजमध्ये फार पूर्वी राबवलं होतं. उत्तम नागरिक घडविणे हेच या महाविद्यालयाचे उद्दिष्ट राहिले आहे, ते यापुढेही कायम राहील आणि महाविद्यालय आगामी काळात यशाची उत्तुंग शिखरं पादाक्रांत करेल असा विश्वास डॉ. सिंगरू यांनी बोलून दाखविला.
ना. संजय राठोड यांनी सांगितले की, श्रद्धेय बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या दाते महाविद्यालयामध्ये मी अकरावीपासून पदवीपर्यंत पाच वर्षे शिकलो. प्राध्यापकांकडून ज्ञान, शिस्त, प्रेम, शिक्षा या सर्वांसोबत आपुलकीदेखील मिळाली. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनासाठी उपयोगी अमूल्य धडे मिळाले. नेतृत्वाचेही गुण इथेच विकसित झाले. त्यातून आत्मविश्वास आणि अनुभव मिळाला. या महाविद्यालयाच्या शिस्तीचा फायदा मला राजकारण आणि समाजकारण करतानाही झाला, असे प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी येथे केले. माजी विद्यार्थी मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ज्ञानेश्वरांचे पसायदान ज्या महाविद्यालयाने प्रार्थना म्हणून स्वीकारले, तेथे महाविद्यालयाचे घोषवाक्यसुद्धा बाबाजींनी 'येणे वाग्यज्ञे तोषावे' असेच ठेवले. या ठिकाणी चालणारा वाग्यज्ञ माझ्याकरता फार महत्त्वाचा ठरला, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी यावेळी बोलताना केले. माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत रानडे यांनी यावेळी बाबाजींचे स्मरण सातत्याने होत असते असे म्हटले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचे संकलन असणाऱ्या ई-स्मरणिकेचे प्रातिनिधिक विमोचन करण्यात आले. प्रा. राम पंचभाई यांनी कार्यक्रमाचे संचालन तर उपप्राचार्य ताराचंद कंठाळे यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रा. न. मा. जोशी, प्रा. आशा देव, डॉ. ठोंबरे, प्रा. निर्मला मेश्राम, विजय दीक्षित, प्रा. विनोद तलांडे, डॉ. दरवरे, शरद सहस्रबुद्धे, कुर्हेकर, यन्नावार इत्यादींचा समावेश होता.
उद्घाटनानंतर बॅच नुसार बैठका व फोटो, आपल्या वर्गांना भेटी, सेल्फी, मित्र मैत्रिणी समवेत गप्पा, जुन्या आठवणींना उजाळा, काही जुने खेळ इत्यादी समवेत माजी विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
सायंकाळी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सादर केलेला मनोरंजनाचा कार्यक्रम झाला व स्नेह मिलनाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम संस्मरणीय झाला व त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. असे मेळावे सातत्याने भरवावे असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.